मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

परतीच्या मॉन्सूनमागील विज्ञान


मॉन्सून सध्या परतीच्या वाटेवर आहे. सलग सातव्या वर्षी मॉन्सूनचा प्रवास हा सर्वसाधारण तारखेपासून लांबला आहे. 
हवामानशास्त्रज्ञ मॉन्सूनबाबत दोन गोष्टी ठामपणे सांगू शकतात. (खरतर आता कोणीही सांगू शकतं)  १) मॉन्सून दरवर्षी निश्चित येतोच आणि तसाच माघारीही फिरतो. २) मॉन्सून काळात पाऊस सर्वसाधारणपणे सरासरीच्या ७५ टक्क्यांहून कमी पडत नाही. या दोन्ही गोष्टींमध्ये पृथ्वी आणि सूर्य यांच्या संबंधांच विज्ञान लपलेलं आहे. 
सूर्याभोवती ३६५ दिवसांमध्ये एक फेरी पूर्ण करताना पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सूर्याच्या स्वतः भोवती फिरण्याच्या अक्षाशी (सूर्याचा अक्ष प्रमाण आणि स्थिर मानला तर) २३.५ अंशांचा कोन करतो (सूर्याला प्रमाण मानलं तर पृथ्वी २३.५ अंशांनी कललेली आहे.). या कोनामुळेच खरतर पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण झाले आहे. सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना अर्धा काळ उत्तर गोलार्धाने सूर्याकडे तोंड केलेले असते, तर अर्धा काळ दक्षिण गोलार्धाने सूर्याकडे तोंड केलेले असते. ज्यावेळी उत्तर गोलार्धाने सूर्याकडे तोंड केलेले असते त्यावेळी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो (भारत उत्तर गोलार्धात आहे). ज्यावेळी पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे तोंड करून असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. मात्र पृथ्वीवर सूर्याचे किरण सर्वाधिक लंबरूप पडतात ते विषुववृत्तापासून २३.५ अंश उत्तर आणि २३.५ अंश दक्षिण या भागात (पृथ्वीच्या अक्षाने सूर्याशी केलेला कोन कारणीभूत). या भागाला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणतात (ट्रोपिकल रिजन), भारताचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. याच उष्ण कटिबंधीय प्रदेशात जर तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला मोठा भूभाग असेल, तर अशा भागात समुद्र आणि जमिनीच्या दरम्यान सूर्याच्या उष्णतेने बदलणाऱ्या दाबांमुळे मॉन्सूनसारखी घटना अनुभवायला मिळते. म्हणूनच मॉन्सून हा फक्त भारत किंवा दक्षिण आशियातच नाही, तर तो आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका या भागांतही अनुभवायला मिळतो.


दक्षिण गोलार्धात सूर्य त्याच्या सर्वाधिक उंचीवर म्हणजे विषुववृत्तापासून २३.५ अंश दक्षिणेला जातो (२२ डिसेंबर), त्यावेळी दक्षिण गोलार्धात उन्हाळा चरणसीमेवर  असतो. त्यावेळी सूर्याच्या उष्णतेमुळे दक्षिण गोलार्धात कमी दाब असतो, तर उत्तर गोलार्धात जास्त दाब असतो. तिथून सूर्याचे पुन्हा उत्तरायण सुरु होते. २१ मार्चला सूर्य विषुववृत्त ओलांडत असतो त्यावेळी दोन्ही गोलार्धात दिवस- रात्र समान कालावधीचे असतात. तिथून पुढे उत्तर गोलार्धात सूर्य जसा जसा वर सरकतो, तसा उत्तर गोलार्धातील उन्हाळा वाढू लागतो. या वेळी उत्तर गोलार्धात कमी दाब निर्माण होतो आणि दक्षिण गोलार्धात जास्त दाब असतो. २१ जून रोजी सूर्य उत्तरेला त्याच्या चरणसीमेवर असतो (विषुववृत्तापासून २३.५ अंश उत्तर). हवामानशास्त्रात एक मूलभूत नियम आहे..तो म्हणजे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. सूर्य ज्यावेळी उत्तर गोलार्धात सरकू लागतो त्यावेळी उत्तर गोलार्धात निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाकडून वारे उत्तर गोलार्धाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांबरोबर सूर्याच्या उष्णतेने निर्माण झालेले बाष्पही मोठ्या प्रमाणावर येते. भारतात हे बाष्पयुक्त वारे नैरुत्येकडून प्रवेश करतात, यालाच आपण मॉन्सून म्हणतो.

 २१ जून नंतर सूर्य पुन्हा दक्षिणेला सरकू लागतो, २२ सप्टेंबरला तो विषुववृत्त ओलांडेपर्यंत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाची बरीच क्षेत्रे निर्माण करतो. त्यामुळे या कालावधीत भारताला मोठ्या प्रमाणात पाऊस मिळतो. २१ सप्टेंबरनंतर सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात पुढे सरकू लागतो त्या वेळी दक्षिण गोलार्धात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते, तर उत्तर गोलार्धातील दाब वाढू लागतो. यामुळे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच मॉन्सूनच्या विरुद्ध दिशेने वाहू लागतात. या कालावधीत बंगालच्या उपसागरातील काही बाष्प घेऊन ते पाऊस पडतात. यालाच आपण परतीचा मॉन्सून म्हणतो.
पूर्व किनाऱ्यावरील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना ईशान्य मोसमी पावसामुळे (विरुद्ध दिशेनी येणाऱ्या वाऱ्यान्पासून) मोठा पाऊस मिळतो. तामिळनाडू हे बरेच दक्षिणेला असल्यामुळे तिथे हा मॉन्सून अगदी डिसेंबरपर्यंत सुरु असतो.
परतीच्या मॉन्सूनसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही निकष मांडले आहेत. त्या नुसार टप्प्याटप्प्याने मॉन्सून देशाच्या विविध भागांतून बाहेर पडल्याचे जाहीर केले जाते. ते निकष असे-
मॉन्सूनचा परतीचा प्रवास देशाच्या वायव्य भागातून सुरु होतो (याच भागात तो सर्वात शेवटी पोचत असतो). हा प्रवास १ सप्टेंबरच्या आधी कधीच सुरु होत नाही.
१ सप्टेंबरनंतर हवामानाचे खालील घटक वायव्य भारतातील मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी गृहीत धरले जातात.
१) सलग ५ दिवसांसाठी पावसाचा अभाव 
२) वातावरणाच्या खालच्या ठरत 'एन्टी सायक्लोनिक' स्थिती निर्माण होणे. 
३) सैटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून या भागातील वातावरणात कमी झालेले बाष्प

 त्यानंतर देशाच्या इतर भागांतून मॉन्सून माघारी फिरला असे जाहीर करण्यासाठी खालील निकष लावले जातात.
१) संबंधित भागासाठी सैटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून वातावरणात कमी झालेले बाष्प आणि सलग ५ दिवसांसाठी कोरडे हवामान
२) नैऋत्य मोसमी पाऊस हा दक्षिणेकडून येत असल्यामुळे संपूर्ण देशातून तो एक ऑक्टोबर च्या आधी बाहेर पडत नाही. त्या नंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये झालेला बदल पाहून मॉन्सून संपूर्ण देशातून बाहेर पडला असे जाहीर केले जाते.

वरील माहिती वरून असे दिसून येते की, मॉन्सून ही घटना मुख्यत्वे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणातून होत असल्यामुळे त्याच्या येण्या आणि जाण्यात फार मोठे चढ- उतार असू शकत नाहीत.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा