बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

प्रोजेक्ट मेघदूत- सिझन २

अल्लाह मेघ दे पानी दे छाया दे रे तू ..रामा मेघ दे.. श्यामा मेघ दे ..
आंखे फाडे दुनिया देखे आज ये तमाशा.. है ये विश्वास मेरे.. है मेरी आशा..
पूर्वोत्तर भागाचा काही अपवाद सोडता देशाच्या काना- कोपऱ्यातून व्यक्त होणारी ही आर्त साद मॉन्सूनच्या कोरड्या वाऱ्यांबरोबर दूर दूर वाहत चालली आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मॉन्सूनचे वारे कित्येक दिवस घोंघावत आहेत . मात्र, त्यांच्या सोबतीला जलधारांचे संगीत नाही आणि कृष्णमेघाचे धीर गंभीर सूरही नाहीत..
२०११ सालचा मॉन्सून गेल्या कित्येक वर्षातला सर्वोत्तम मानला गेला होता. सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडल्यामुळे पुढील वर्षी (म्हणजे २०१२) पावसाला थोडा विलंब झाला तरी चालेल एवढा पाऊस  झाल्याचे मानले जात होते. पावसाच्या आकड्यांनी निर्धास्त होऊन निसर्ग सदा सर्वकाळ एकाच प्रदेशावर मेहेरबान राहत नसतो हे साधे गणित आपण विसरलो. आकाशातून बरसलेली मोफत जलसंपत्ती आपण पुरेशी साठवली नाहीच , पण जी साठवली तिचाही वाट्टेल तसा वापर करून स्वतःची दयनीय अवस्था करून घेतली. हतबल अवस्थेत आकाशाकडे टक लावून बसण्याव्यतिरिक्त आता दुसरा पर्याय नाही. मॉन्सून दरवर्षी आपल्याला त्याचे विविध रंग दाखवत असतो.. गेल्या वर्षीच्या जलरंगानंतर आता काही कोरडे फटकारे!
मॉन्सूनच्या अशाच विविध रंगांचे प्रतिबिंब भारताच्या निसर्गात आणि समाजात त्या त्या वर्षी कसे उमटते हे अभ्यासण्यासाठी २०११ पासून 'प्रोजेक्ट मेघदूत'ला सुरुवात झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणलेल्या जलधारांच्या सोबतीनेच पश्चिम घाटातून पावसाचा पाठलाग करीत प्रोजेक्ट मेघदूतची टीम महाराष्ट्रापर्यंत पोचली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरून पावसाचे आणि त्या प्रदेशाचे नाते काय हे तपासण्याचाही प्रयत्न केला गेला. कोवलमच्या किनारी पालथ्या होड्यांवर बसून समुद्राकडे एकटक पाहणारा मल्याळी मच्छिमार असो किंवा पावसाळ्यात छत्र्यांचा व्यवसाय करून कोट्यावधी रुपये कमावणारा आलेप्पीचा बिझनेसमन असो..पावसाचे भारतीय जीवनावर किती थेट आणि खोल परिणाम होतात हे प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन १ मध्ये जवळून पाहता आले. त्याचप्रमाणे कोकणातील खारवी मच्छिमार, मेळघाटातला कोरकू आदिवासी, गडचिरोलीचा गोंड आदिवासी, कोल्हापूर जवळचा कुणबी शेतकरी, घाटातला धनगर आशा अनेकांशी संवाद साधून त्यांचे पावसाचे आडाखे आणि पिढीजात त्यांना मिळालेले निसर्ग निरीक्षणाचे ज्ञान समजावून घेतले. मुसळधार पावसात पहिल्या वर्षी दक्षिण भारत अनुभवून झाल्यानंतर यावर्षी प्रोजेक्ट मेघदूत पावसाबरोबर (?) ..खरतर मॉन्सूनबरोबर मध्य भारतातील स्थिती अभ्यासणार आहे. 


मध्य भारताचे मॉन्सूनच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. या भागात अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागाराकडून अशा दोन्ही बाजूंनी येणाऱ्या मॉन्सूनच्या शाखांचा मिलाफ होतो आणि जलधारांचा वर्षाव होतो. सातपुडा, विन्ध्य पर्वतांबरोबर नर्मदेचे खोरे आणि घनदाट पेंच, बांधवगडसारख्या अभयारण्याने समृद्ध निसर्ग लाभलेल्या या प्रदेशाचे भारताच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्वही तितकेच आहे. भोजपूर, उज्जैन, चित्रकुट, इंदौर, मांडू, विदिशा ही ठिकाणे देशाच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य या बरोबरच ज्ञान- विज्ञानाच्या निर्मितीचा कळस या प्रदेशाने अनुभवला आहे. मौर्य, गुप्तांपासून मोघल, राजपूत, मराठा आणि इंग्रजांपर्यंत सर्व शासकांच्या खुणा या भागात घडलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय घटना आजही डोळ्यासमोर उभ्या करतात. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर या प्रदेशातील निसर्गात आणि समाजात काय बदल होतात हे पाहतानाच मॉन्सूनची या भागातील निसर्गाच्या, भूगोलाच्या आणि सामाजिक रचनेच्या जडणघडणीत नेमकी भूमिका काय हे अभ्यासण्याचा प्रयत्न प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन २ मध्ये करण्यात येणार आहे. मध्य भारतातील पर्वतीय भागात राहणारे आदिवासी, तसेच  नर्मदेच्या खोऱ्यात शेती करणाऱ्या शेतकर्यांकडे मॉन्सूनबद्दल काय ज्ञान आहे तेही तपासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे.
या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाकवी कालिदासाने त्याच्या मेघदूत या काव्यात मेघाला सांगितलेल्या मार्गावरून (मध्य भारतातील) हा प्रवास होणार आहे. या प्रवासात मेघदूतमध्ये उल्लेख केलेल्या विविध स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथून प्रत्यक्ष हवामानाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्या ठिकाणावरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची आणि ढगांची दिशा नेमकी काय आहे, त्याने उल्लेख केलेल्या प्रदेशातील निसर्गात आणि भूगोलात आता काय फरक झालेला आहे हेही तपासण्याचे उद्दिष्ट प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन २ साठी ठेवण्यात आले आहे. १९९३ मध्ये पुण्यातील नामवंत डॉक्टर एस. व्ही. भावे यांनी त्यांच्या स्वतःच्या विमानातून मेघदूतच्या मार्गाचा मागोवा घेतला होता. त्यांच्या अनुभवांचा आधार घेऊन त्या मार्गावरील जमिनीवरील स्थिती नेमकी काय आहे हे तपासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मेघदूत काव्यामधील हवामानशास्त्र तपासले जातानाच त्या काळात हे ज्ञान कसे निर्माण झाले याचेही उत्तर पुढील काळात मिळू शकणार आहे.     
मॉन्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबामुळे प्रोजेक्ट मेघदूतचा मध्य भारतातील प्रवास ३० जून ते १० जुलै या कालावधीत होणार आहे. नागपूरजवळील रामटेकपासून या प्रवासाला सुरवात होणार असून पेंच, पचमढी, भेडाघाट , जबलपूर, चित्रकुट, खजुराहो या मार्गाने पश्चिमेकडे विदिशा, भोपाळ, भीमबेटका, उज्जैन , इंदौर असा दहा दिवसांचा प्रवास राहणार आहे. शेतकरी, आदिवासी, विविध विषयांचे तज्ञ, पत्रकार, साहित्यिक, कलाकार यांच्या मुलाखती घेण्याबरोबर ठिकठिकाणी थांबून तेथील हवामानाच्या नोंदी घेण्याचे काम प्रोजेक्ट मेघदूतची टीम करणार आहे. या सर्व घटनांचे, तसेच निसर्गात आणि समाजात होणाऱ्या बदलांचे नियमितपणे छायाचित्रणही करण्यात येणार आहे. सिझन २ साठी १० जणांची टीम काम करीत असून, यामध्ये पत्रकार, आयटी प्रोफेशनल, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मॉन्सून म्हणजे फक्त पाऊस नाही हे माहित असूनही हा प्रवास मॉन्सूनच्या पावसाबरोबरच व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. म्हणूनच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कधी तयार होते आणि मॉन्सूनची दमदार प्रगती कधी सुरु होते याकडे आम्हा सर्वांचे लक्ष लागून आहे.

१५ जून २०१२ 

मंगळवार, २४ जुलै, २०१२

बाळाची लीला !


दूर त्या प्रशांत महासागरावर कोपऱ्यात म्हणे एका अंशांनी पाणी तापलं..
पोटाचा घेर घेऊन फिरणाऱ्या पृथ्वीला मात्र ते उबदार बाळ वाटलं..

बाळ येणार म्हणून सर्वत्र धावपळ उडाली.. 
भारतात जायला निघालेली वाफ तातडीने जपानला पोचली..

तापट बाळाची डिलिव्हरी.. झाली नाही नॉर्मल,
कळा पोचल्या दिल्लीत, न्यूयॉर्कलाही सिग्नल

स्पेनने केले बारसे त्याचे.. ठेवले नाव 'एल निनो'
बाळाचे पाय पाळण्यात दिसताच कामास लागली युनो

बाळाचे हट्ट काय विचारता.. सगळाच लहरी कारभार
टायफूनच्या भिंगऱ्या फिरू लागताच कोरडे पडले म्यानमार

बाळाच्या लीला पाहून वाढला इंडोनेशियावर दाब
त्याच्या टेन्शनमुळे मग चढला राजस्थानलाही ताप

बाळाच्या हट्टासाठी धावले पूर्वेकडे वारे
आपलं काय होणार चिंतेत पश्चिमेकडे सारे 

हे बाळ नाही साधे सर्वांना झाली जाणीव 
कॅलिफोर्निया वाहू लागले भारतात मात्र उणीव

छोट्या वयात केंद्रित सत्ता अशी नाचू लागली
जगभरातील गरीब जनता घासासाठी वणवणली

आपली चूक लक्षात येताच पृथ्वीनेही घेतले प्रायश्चित्त
एल निनोला ला नीनाने... केले तत्काळ शांत..

दिवस चालले शांततेत म्हणता पुन्हा कोणीतरी शिंकलं
दूर त्या प्रशांत महासागरावर कोपऱ्यात म्हणे एका अंशांनी पाणी तापलं..

- मयुरेश प्रभुणे 
२४ जुलै, २०१२  



सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

'ब्लैक' सायन्स डे..


स्थळ: आघारकर संशोधन संस्था, वेळ: सकाळी दहाची, निमित्त: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे.. भारतीय अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे पद भूषवलेले आणि भारताला एकविसाव्या शतकात जगातील इतर अणूशक्तींच्या पंक्तीत बसवणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान सुरु असते... त्यांच्या व्याख्यानाला नेहमीप्रमाणेच सभागृह हाउसफुल्ल असते. आपल्या शांत, सोप्या शैलीत डॉ. काकोडकर देशाच्या प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी आणि दिवसागणिक वाढणारी उर्जेची आवश्यकता भरून काढण्यासाठी अणूउर्जेला पर्याय कसा नाही हे शास्त्र शुद्धपद्धतीने मांडतात.. अणूउर्जेविषयी देशात सध्या निर्माण झालेल्या (किंवा जाणीवपूर्वक केलेल्या) संभ्रमावस्थेमुळे अपेक्षेप्रमाणे नागरिकांकडून जैतापूरवर प्रश्न येतात.. त्या प्रश्नातील अपप्रचार खोडून काढताना डॉ. काकोडकर नेमके वास्तव नागरिकांसमोर ठेवतात.. टाळ्यांचा गजर होतो.. आणि मानवाने शोध लावलेल्या या अनोख्या ऊर्जास्रोताचे स्वागत होते... त्याचवेळी एकाएकी सभागृहाबाहेर पत्रकारांची गर्दी होते.. डॉ. काकोडकरांची प्रतिक्रिया घेण्यासाठी कॅमेरे सरसावतात.. मात्र जैतापूरविषयी प्रश्न विचारण्यास आयोजक प्रतिबंध घालतात.. डॉ काकोडकरही अशा प्रश्नांवर 'नो कमेंट्स' हे एकच उत्तर देतात...
दिवस तोच, स्थळ तेच.. वेळ सकाळी नऊची.. स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे पाच- दहा तरुण संशोधन संस्थेच्या गेटवर एक 'फतवा' देतात.. 'डॉ काकोडकरांनी येथे जैतापूरबद्दल एकही अक्षर उच्चारू नये अन्यथा आम्ही 'आमच्या पद्धतीने' निदर्शने करू' असा मजकूर त्या 'फतव्या'मध्ये असतो.. आयोजकांकडूनही त्यांना तशीच ग्वाही दिली जाते.. दुर्दैवाने काकोडकरांच्या व्याख्यानानंतर झालेला नागरिकांच्या टाळ्यांचा गजर ऐकायला त्यांच्यापैकी एकही जण उपस्थित नसतो..
डॉ. काकोडकर यांच्या व्याख्यानाला झालेला हा पाहिला विरोध नाही.. याआधी लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य याबद्दल अखिल विश्वाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर असण्याच्या थाटात वावरणाऱ्या डाव्या विचाराच्या पुण्यातील एका संघटनेनेही अशाच प्रकारच्या निदर्शनांनी सभागृहाबाहेरूनच कार्यक्रम उधळून लावायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याही व्याख्यानाला आलेल्या नागरिकांनी व्याख्यानानंतर टाळ्यांच्या गजराने विज्ञानाच्या या आविष्काराला आपला पाठींबा दर्शवला होता. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. 'विरोधासाठी विरोध' या एकच तत्वाने प्रेरित झालेल्या या गटांना या विषयातील ज्ञानाच्या आपल्या मर्यादेबरोबर लोकांमध्ये अणूउर्जेविषयी असणारे कुतूहल लक्षात आल्याने शेवटी शास्त्रज्ञांना बोलूनच द्यायचे नाही हा मार्ग स्वीकारला.. मात्र असे करताना समाजाचे आपल्या दुटप्पी वर्तनावर लक्ष जाऊ शकते हे मात्र डावे - उजवे दोघेही विसरले. मागील वर्षी डाव्या संघटनेनी एका वादग्रस्त विषयावर आयोजित केलेला कार्यक्रम 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला होता. तेव्हा काकोडकरांचा कार्यक्रम उधळून लावणारे हेच लोक माध्यमांकडे 'लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्याची पायमल्ली' अशी पत्रके घेऊन फिरत होते. शिवसेनेकडून काल झालेले कृत्य अनपेक्षित नसले तरी, स्वतःच्याच वर्तमानपत्रातून 'बेभान'पणे लिखाण करताना याच स्वातंत्र्याचा पुरेपूर लाभ आपण उठवतो.. आपल्या भाषणांमधून तर मतस्वातंत्र्याचा अधिकाधिक फायदा किती उठवता येतो याची प्रचीती आपण नेहमीच देतो.. हे मात्र 'फतवे' काढायच्या आधी आपण सोयीस्करपणे विसरतो.
अणूऊर्जेबाबत समोरासमोर चर्चा करण्याची हिम्मत कोणत्याही विरोधकात नाही हे वास्तव आहे. कारण स्पष्ट आहे.. आपण 'रेटत' असलेल्या माहितीमागील सत्य उघडे पडण्याची चिंता डाव्या- उजव्या अशा दोघांनाही आहे. अणूऊर्जेविषयीची किंवा जैतापूरविषयीची तुमची भूमिका, तुमच्याकडे असणारी माहिती विविध माध्यमातून तुम्ही नागरिकांसमोर मांडत आहातच, मग शास्त्रज्ञांना त्यांची भूमिका, त्यांच्याकडे असणारी माहितीही मांडण्याचा अधिकार आहे. यापैकी कोणाला पाठींबा द्यायचा हे नागरिकांनाच ठरवूद्यात. 
साहित्य, इतिहास, कला या क्षेत्रांत दडपशाही करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असतानाच आता विज्ञानाच्या क्षेत्रातही ही घूसखोरी होऊ लागली आहे हे देशाचे खरोखर दुर्दैव म्हणावे लागेल. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रयोगशाळांचे दरवाजे सर्वसामन्यांसाठी खुले केले जातात. या वर्षीच्या विज्ञानदिनी एका संशोधन संस्थेला दरवाजे बंद करून आत कार्यक्रम घ्यावा लागतो आणि त्या बंद दरवाज्यांच्या आत शास्त्रज्ञांनी काय बोलावे काय बोलू नये हेही जेव्हा एखादा अज्ञानी ठरवतो (आणि शास्त्रज्ञही त्याला बळी पडतात).. तेव्हा वैज्ञानिक भारताचे स्वप्न आणखी किमान चारशे वर्षे लांब आहे याची खात्री पटते...


....कारण.. हा काळ आहे: सतरावे शतक आणि इथे धर्मसत्तेच्या आणि धर्मग्रंथातील दाखल्यांच्या विरोधात एक अवाक्षर काढण्याची मुभा नाही.. तो पहा गजाआड गैलिलिओ हतबद्ध बसला आहे.. त्याच्यावर गंभीर आरोप आहे..एका छोट्या नळकांडीतून तो जादुई दृश्ये दाखवतो आणि पृथ्वीभोवती ग्रह- तारे फिरत नाहीत असे काही तो बडबडतो.. धर्मग्रंथातील सृष्टीनियमांच्या हे विरुद्ध आहे.. भोग आता आपल्या कर्माची फळे !!