बुधवार, २५ मे, २०११

'मॉन्सून डायरी'- २५ मे २०११, पुणे

(आजपासून 'वैश्विक'वर 'मॉन्सून डायरी' सुरु करीत आहे. प्रोजेक्ट मेघदूतच्या दैनंदिन नोंदी, प्रवासातील अनुभव रोजच्या रोज शक्यतो 'लाइव्ह' देण्याचा प्रयत्न राहील. मॉन्सूनचे वारे महासागरात माघारी फिरेपर्यंत 'मॉन्सून डायरी' मॉन्सूनचे इतिवृत्त कळवत राहील. अभिप्राय, सूचना जरूर कळवाव्यात.)   
------------------------------------------------------------------------------------  
    

गेल्या दोन वर्षांत मॉन्सूनची दोन अगदी विरुद्ध रूपे भारताने पाहिली. २००९ मध्ये 'एल निनो' (प्रशांत महासागरातील गरम पाण्याचे प्रवाह) सक्रीय असताना भारतात गेल्या ३० वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ पडला (सरासरीच्या ७८ टक्के पाऊस). आणि २०१० मध्ये 'ला निना' (एल निनो ची विरुद्ध स्थिती) असताना भारताच्या बहुतेक भागात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला. आता तिसऱ्या वर्षी काय होणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) त्यांच्या दीर्घकालीन अंदाजामध्ये यावर्षी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता असल्याचे वर्तवले आहे. आयएमडीतर्फे दुसरा अंदाज देण्यात आला आहे, तो म्हणजे त्याच्या केरळमधील आगमनाचा. ३१ मे रोजी नैऋत्य मोसमी वारे केरळच्या किनाऱ्यावर धडकतील असे या अंदाजात म्हटले आहे. 
---------
पार्श्वभूमी 
साधारणपणे मे च्या मध्यात भारताला मॉन्सूनचे वेध लागतात. याच काळात मॉन्सूनचे वारे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात प्रवेश करतात. १५ ते २० मे दरम्यान मॉन्सून अंदमानच्या समुद्रात पोचतो (या तारखा पुढे मागे होतातच). त्यानंतर आठवडाभरात मॉन्सूनची एक शाखा अरबी समुद्रातून केरळमध्ये, तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पूर्व किनाऱ्यावर प्रवेश करते. भारताच्या मुख्य भूमीवर मॉन्सूनचे वारे एक जून रोजी प्रवेश करतात असे मानले जाते. 

यावर्षी १५ मे ते २५ मे हा कालावधी पहिला तर हवामानशास्त्रीयदृष्ट्या काय स्थिती होती ते पाहू..
१) एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटांच्या अभावामुळे यावर्षी उन्हाळा विशेष जाणवलाच नाही.
२) मे महिन्यातही पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे (वेस्टर्न डीस्टर्बन्स)  दर वर्षीच्या तुलनेत उष्ण दिवसांची संख्या (तापमान ४० अंशांच्या वर) देशातील बहुतेक शहरांमध्ये कमीच राहिली. थोडक्यात काही भाग वगळता उन्हाळा तुलनेने 'थंड' होता.
३) मात्र, १५ मे नंतर उत्तर भारत, राजस्थान आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली. राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्रात पाऱ्याने ४७ अंशांपर्यंत मजल मारली.
४) १७ ते २० मेच्या दरम्यान उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान घातले.            
५) उत्तर प्रदेशात वादळी वारा आणि विजांसह आलेल्या पावसाने ४२ जणांचा बळी घेतला. या मध्ये वीज अंगावर पडून, वादळामुळे झाड, घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश होता. या घटनांमध्ये ५० हून अधिक जण जखमीही झाले.
६) राजस्थान मध्ये या कालावधीत धुळीच्या वादळाने आकाश घेरले. 
७) मात्र, उत्तर, मध्य भारतासह महाराष्ट्रातहि अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा कायम राखला.

वरील सर्व स्थिती 'मॉन्सून येत आहे' हेच दर्शवत असल्याचे हवामानतज्ञांचे म्हणणे आहे. उत्तर भारतात धुळीची वादळे येणे, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणे हि मॉन्सूनपूर्व हवामानाची लक्षणे आहेत. सध्या महाराष्ट्रात पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता अधिक असून, वातावरण ढगाळ असल्यामुळे कमाल तापमान नियंत्रणात आहे. त्याच वेळी पूर्व किनाऱ्यावरहि नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढला असल्याच्या नोंदी आयएमडीच्या वेधशाळांनी घेतल्या आहेत.

मात्र, सर्वसाधारणपणे १५ ते २० मे दरम्यान अंदमानमध्ये दाखल होणारा मॉन्सून २५ मे उजाडूनहि अंदमान पर्यंत न पोचल्यामुळे काळजीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनचे केरळमधील आगमन लांबते कि काय अशी चिंता सर्वांना लागून आहे. आयएमडीतर्फे मात्र ३१ मे चा दिलेला अंदाज योग्य असल्याचे ठासून सांगण्यात येत आहे (त्यात +/- ४ दिवसांचा एरर आहे.. त्यांना काय जातंय सांगायला..) भारताच्या दक्षिण भागात पूर्व- पश्चिमेला ढगांची मोठी गर्दी दिसत आहे. तरीही आयएमडीतर्फे मॉन्सूनचे आगमन जाहीर का होत नाही हे अनेकांना उमजत नाहीये.

काही तज्ञांकडून मिळालेल्या माहिती नुसार बाष्प असले तरी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रातील आगमन लांबले आहे. (याचा अर्थ..मॉन्सून येणे म्हणजे नैऋत्य मोसमी वारे येणे..नुसते ढग असून उपयोग नाही.) अशी स्थिती असताना आज दुपारी आयएमडीने येत्या तीन दिवसात मॉन्सून अंदमानच्या समुद्रात दाखल होईल अशी शक्यता वर्तवली आहे. याचा अर्थ उद्या किंवा परवा मॉन्सून अंदमानात दाखल होईल आणि केरळच्या दिशेने कूच करेल. सध्या हिंदी महासागरात दिसणारे बाष्प या वाऱ्यांच्या साथीला आले, तर या वर्षी मॉन्सूनचे आगमन धडाक्यात होईल यात शंका नाही.

 (नोंद: २००९ मध्ये मॉन्सून केरळमध्ये.., कर्नाटकात.,. कोकण मध्ये..., पुण्यात.. अशा बातम्या येत होत्या..मात्र पाऊसच नव्हता. याचा अर्थ मॉन्सूनचे वारे ठराविक दाबासह किमान पाऊस पडत पुढे सरकत होते. मात्र त्या वाऱ्यांबरोबर बाष्प नसल्यामुळे मॉन्सून पावसासह नाही तर, नुसताच कागदावर पुढे सरकत होता.)
---------------------------------------
प्रोजेक्ट मेघदूत अपडेट 

- तयारी अंतिम टप्प्यात आली असून, उद्या दिवसभरात आयएमडीची उपकरणे हाताळणे, पावसाच्या, हवामानाच्या नोंदी ठेवणे यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
- सहभागींची लिस्ट जवळ जवळ फायनल झालीच आहे.
- प्रकल्पाच्या काही खर्चासाठी अजूनहि काही स्पॉन्सरशीप मिळतीये का ते पाहणे सुरु आहे.
- केरळमध्ये भेट द्यावयाच्या विविध क्षेत्रातील २० पेक्षा जास्त संस्थांची यादी तयार आहे.
- आज ऋषिकेश आणि अभिषेकने बोहरीआळी आणि अप्पा बळवंत चौकातून बरीच खरेदी केली.
- मॉन्सूनचा अपडेट पाहून लवकर निघण्यावर (२७ ला सकाळी) विचार सुरु आहे.              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा