शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

स्पेक्ट्रम



दुपारी तीनची वेळ असेल. राउंडटेबलच्या एका बाजूला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि जीएमआरटी या महाकाय रेडिओ दुर्बिणीचे निर्माते डॉ. गोविंद स्वरूप, एनसीआरएचे संचालक डॉ. एस. के घोष, डॉ. गोपाल कृष्णन, डॉ यशवंत गुप्ता, डॉ. ईश्वर चंद्र, तरुण शास्त्रज्ञ डॉ. संदीप सिरोथिया असे सर्व रथी महारथी आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातील निवडक मराठी- इंग्रजी वर्तमानपत्रांचे बातमीदार. आजची पत्रकार परिषद जीएमआरटीतर्फे प्रथमच राबवण्यात येणाऱ्या एका महत्वाकांक्षी सर्वेक्षणाबाबत होती. १५० मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवर जीएमआरटीच्या ३० रेडिओ दुर्बिणींच्या साह्याने भारतातून दिसणाऱ्या ९० टक्के आकाशाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दुसऱ्या शब्दात या ९० टक्के आकाशाचे रेडिओ नकाशे तयार करण्याचे काम सुरु असून अंतिमतः यातून सुमारे २० लाख रेडिओस्रोतांची नोंद होण्याची अपेक्षा आहे. यापैकी हजारो स्रोत असे असतील जे प्रथमच नोंदले जातील.. म्हणजेच विश्वातील हजारो नव्या रेडिओस्रोतांचा शोध. यामध्ये मृत आकाशगंगांचे अवशेष असतील, कृष्णविवरे असतील, पल्सार, सक्रीय आकाशगंगा असतील. हि सर्व माहिती इंटरनेटवरून विद्यार्थी, संशोधकांसाठी मोफत उपलब्ध असेल.. प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सिरोथियांनी प्राथमिक माहिती दिल्यावर प्रश्नोत्तरे सुरु झाली.
खरतर अशी टेक्नीकल माहिती समोर बसलेल्या एखाद- दुसऱ्या पत्रकारालाच समजली. कारण प्रत्येकाची पार्श्वभूमी. हि माहिती सायन्सच्या विद्यार्थ्यालाहि समजली असतीच असे नाही. मग आर्ट्स, कॉमर्स करून आलेल्या मराठी पत्रकारांना या माहितीतून बातमी शोधणे म्हणजे महाकठीण. पण मिळालेली माहिती मग ती कोणत्याही विषयाची असो, आधी आपण समजून घेऊन मग ती आपल्या वाचकांना समजेल अशा भाषेत बातमीच्या स्वरुपात बसवण्याची किमया पत्रकारांना रोजच साधावी लागते. प्रश्न सुरु झाले.. एकाने विचारले, हे सर्व ठीक आहे.. यामध्ये सर्वसामान्यांच्या इंटरेस्टचं काय आहे? गोपाल कृष्णन म्हणाले, "विज्ञान, खगोलशास्त्राबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी हेच पुरे आहे, कि भारतातर्फे हे प्रचंड व्याप्तीचे सर्वेक्षण होत आहे.. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, कॅलटेकसारख्या विद्यापीठांतून दररोज हि माहिती डाऊनलोड केली जात आहे. यातून लागणारे शोध हे महत्वाचे आहेतच पण, भारताचे या क्षेत्रातील स्थान दरवर्षी विशेष उंची गाठणार आहे. आजपर्यंत वैज्ञानिक माहितीसाठी आपण जगावर अवलंबून होतो..आता जग आपल्या माहितीचा आधार घेत आहे. याविषयीचे संशोधन प्रसिद्ध होईल त्या प्रत्येकवेळी जीएमआरटीचे नाव अधोरेखित होईल.''
दुसरा प्रश्न आला, 'याच फ्रिक्वेन्सीवर सर्वेक्षण करण्याचे कारण काय, आधी असे सर्वेक्षण झाले आहे का?'
यावर ईश्वर चंद्र म्हणाले, "या रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे घेतलेल्या प्रतिमांचे रीझोल्यूशन अधिक चांगले आहे. याआधी अमेरिकेतून झालेल्या सर्वेक्षणाच्या प्रतिमा आणि या सर्वेक्षणाच्या प्रतिमांची आम्ही तुलना केली असता, एकाच प्रतिमेत अनेक नव्या गोष्टी सापडल्या, ज्या त्यांच्या दुर्बिणीतून दिसल्या नव्हत्या.'' ते पुढे म्हणाले,''तुम्हाला विद्युत चुंबकीय लहरींचा 'स्पेक्ट्रम' माहित असेलच. गैमा रे, एक्स रे, इन्फ्रा रेड, दृश्य प्रकाश किरण,  रेडिओ लहरी अशा विविध लहरी विश्वातील विविध घटकांपासून निघत असतात. एकाच घटकापासून विविध लहरी उत्सर्जित होतानाही दिसतात. उदा. एक आकाशगंगा दृश्य किरणांद्वारे एका ठिपक्यासारखी दिसत असेल, तर त्याचवेळी तिच्याकडून येणाऱ्या रेडिओ लहरी त्या आकाशगंगेची व्याप्ती त्या ठिपक्यापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे दाखवतात. म्हणजेच डोळ्यांना दिसत नसणाऱ्या अशा अनेक पदार्थांचा समावेश त्या आकाशगंगेत असतो. जोपर्यंत त्या आकाशगंगेकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या लहरींचा आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत ती आकाशगंगा नेमकी कशी आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला दिसणारे विश्व फक्त दहा टक्के आहे, ज्यांच्या पासून प्रकाश किरण येतात.  उर्वरित ९० टक्के विश्व समजून घेण्यासाठी इतर लहरींचा अभ्यास करावा लागतो. प्रत्येक लहारीसाठी स्वतंत्र दुर्बिणी बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी तुलनेनी  अधिक तरंगलांबीच्या रेडिओ लहरींना पकडण्याचे काम जीएमआरटीद्वारे करण्यात येते."
स्वाभाविकपणे पुढचा प्रश्न आला, मग खरे विश्व समजून घेण्यासाठी अशा सर्व लहरींचा एकत्रित अभ्यास करण्यात येतो का? यावर डॉ. चंद्र यांनी काही विदेशी अभ्यासकांचा दाखला देऊन होकारार्थी उत्तर दिले. याला जोड म्हणून मीहि भारताच्या 'एस्ट्रोसैट'ची माहिती दिली. हा उपग्रह इस्रोतर्फे पुढीलवर्षी अवकाशात सोडणे अपेक्षित आहे. हे जगातील पहिले उपकरण असेल, जे अवकाशातील एकाच घटकाच्या एकाचवेळी विविध लहरींच्या साह्याने नोंदी घेईल. यामुळे त्या घटकाचे विविध पैलू त्याच्या एकाच दर्शनातून समोर येतील.. जीएमआरटीचा महत्वाकांक्षी सर्वेक्षणाचा प्रकल्प असो किंवा इस्रोचा 'एस्ट्रोसैट' भारताने या क्षेत्रात आता मोठी मजल मारलेली असून, त्यातील वैज्ञानिक माहितीसाठी जगाला आपल्याकडे येण्यास भाग पडले आहे.. आणखी काही प्रश्नोत्तरे झाली आणि प्रेस कॉन्फरन्समधून आम्ही बाहेर पडलो.. बाहेर पडताना एकजण म्हणाला, 'खूप दिवसांनी असं वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं.. सवय गेली होती चांगलं ऐकायची'.. त्याच्याकडे आधी क्राईम होतं.. नुकतच सायन्स- टेक्नोलोजी बिट आलय..  

पार्किंगमधून गाडी काढता काढता सोबतच्या बातमीदार मित्राला विचारलं, आज आणखी काय?..." आज बराच लोड आहे.. सकाळी विद्यापीठ होतच, आत्ता जीएमआरटी, थोड्या वेळानी रामदास आठवले, रावसाहेब कस्बेंचा 'सांस्कृतिक आव्हाने' विषयावर कार्यक्रम आहे.. कदाचित नाईटशिफ्टहि करावी लागेल..त्यामुळे अण्णा, पाऊस, क्राईम.." गाडीला किक मारून तो निघून गेला. मीहि गाडी सुरु करून निघालो.. वाटेत ठिकठिकाणी आठवलेंचे फ्लेक्स दिसत होते. मेनगेटच्या बाहेर अण्णांना पाठिंब्यासाठी रैलीची सुरवात झाली होती... एकाचवेळी एकाच आवारात किती भिन्न गोष्टी घडत होत्या.. सर्वांचे एकत्रित अस्तित्व सत्य!
गाडीवरून येता येता माझ्या मनात प्रेस कॉन्फरन्समधल्या त्या सगळ्या लहरी आणि बाहेर पडल्यावर या मित्राने सांगितलेल्या वेळापत्रकाने एकाचवेळी गर्दी केली. एकाच फेरीमध्ये जीएमआरटीची वैज्ञानिक माहितीची प्रेस कॉन्फरन्स, आठवलेंच राजकीय भाषण, अण्णांच्या समर्थनाची रैली, विद्यापीठ अशा भिन्न विषयांची माहिती घेऊन त्या- त्या मूडच्या बातम्या लिहिणं किती जिकिरीच काम. पण त्या सर्वांची दखल घेतली तरच वर्तमानपत्रातून त्या दिवसाचं एक परिपूर्ण चित्र तयार होतं. कोणतही एकच चित्र मांडलं तर ते अपूर्ण असेलच, पण तेच खरं मानलं तर गैरसमजहि होऊ शकतो.... अगदी आपल्याला दृश्य स्वरुपात दिसणारं विश्व हेच खरं असं मानण्यासारख.. यातून विविध लहरी एकाचवेळी पकडून विश्वाच्या वर्तमानाचं परिपूर्ण चित्र तयार करणाऱ्या 'एस्ट्रोसैट'ची आणि भिन्न विषयांची माहिती एकाचवेळी मिळवून मानवी वर्तमानाचं विविधांगी चित्रण करणाऱ्या पत्रकाराची नकळतपणे तुलना झाली..
अण्णांचा अपडेट पाहण्यासाठी घरी आल्यावर टीव्ही सुरु केला तेव्हा नेमकी आरडाओरड करून पहिल्या पासूनच या विषयाचं एकांगी दर्शन घडवणारा चैनल लागला.. त्यावरील चर्चा ऐकताना माझ्या डोळ्यासमोर गैलिलीओच्या काळातील पृथ्वीकेंद्रित विश्व उभं राहिलं..         

सोमवार, २५ जुलै, २०११

प्रोजेक्ट मेघदूत: 'महाराष्ट्रातील मॉन्सून'



'महाराष्ट्रातील मॉन्सून' 

पाहता पाहता पावसाळा मध्यावर येऊन ठेपला. मॉन्सूनच्या पहिल्या वाऱ्यांचे स्वागत करायला आम्ही पश्चिम घाटाकडे निघालो या घटनेला दोन महिने झाले. २९ मे रोजी केरळमध्ये आलेले नैऋत्य मोसमी वारे ४१ दिवसांनी ९ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापून पाकीस्तानात पोचले. या वाऱ्यांनी समुद्रावरून आणलेल्या ढगांखालून, त्यांच्याच वेगाने पश्चिम घाटातून आठवडाभर सहप्रवासी म्हणून मनसोक्त फिरलो. पावसाचा - निसर्गाचा संवाद ऐकला, नवनिर्माणाचे नाजूक क्षण जवळून अनुभवले, सामान्यांच्या जीवनावरील परिणाम पाहिला, बदलत्या हवामानातील बदलते व्यवहार अभ्यासले. आपल्याबरोबर नवा ऋतू आणणाऱ्या या वाऱ्यांनी निसर्गात मारलेले रंगेबिरंगी फटकारे त्यांच्याच स्वभावाच्या छटा दर्शवत होते. मॉन्सूनच्या रंगांची उधळण अजूनही सुरूच आहे. कोंब, पालवीचा आषाढ मागे सरून मुक्त बहरणारा श्रावण दारात उभा आहे. 


'प्रोजेक्ट मेघदूत'च्या पहिल्या सिझनचा दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी यापेक्षा कोणता वेगळा मुहूर्त हवा? ऊन- पावसाच्या लहरी लपंडावाबरोबर मॉन्सून आणि महाराष्ट्राचे नाते उलगडण्याचा प्रयत्न या प्रवासातून करण्यात येणार आहे. विविध विभागांनुसार पावसाच्या बदलत्या वितरणाचा महाराष्ट्रातील निसर्गावर, लोकांच्या दैनंदिन जीवनावर, शेतीवर, संस्कृतीवर झालेला परिणाम अभ्यासणे हे या टप्प्याचे मुख्य उद्दिष्ट. चार महिने धोक्याच्या सूचना ऐकून हताश झालेले कोकणातील मच्छीमार, पश्चिम महाराष्ट्रातील सधन बागायती शेतकरी, सतत आत्महत्येचा पर्याय मनात घेऊन वावरणारा विदर्भातील शेतकरी, चमत्कारी पावसाची अपेक्षा ठेऊन आकाशाकडे डोळे लावून असणारा मराठवाड्यातील शेतकरी यांच्याशिवाय मॉन्सूनचे बदलते रंग कोण व्यक्त करू शकेल? राज्याच्या सर्व विभागांत जाऊन त्या विभागाच्या नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मॉन्सूनची नेमकी भूमिका याचे स्केच प्रवासाशेवटी रेखाटले जाण्याची अपेक्षा आहे. अर्थात महाराष्ट्रातील पावसाच्या परिपूर्ण चित्राचे रंग पुढील पाच वर्षांत यथावकाश भरले जातीलच.

एक ऑगस्टपासून सर्वप्रथम कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मध्य- पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र- विदर्भ आणि शेवटी मराठवाडा असा साधारण प्रवासक्रम आहे. हा प्रवास आवश्यकतेनुसार कार, बस, रेल्वे, बाईक, पायी असा करण्याचे ठरविले आहे. सरसकट महिनाभर सुट्टी मिळणे अवघड असल्यामुळे विविध टप्प्यांमध्ये आपल्या सोयीनुसार सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. मॉन्सूनवर (किंवा पावसावर) प्रेम असणारे, धावपळ सहन करू शकणारे, निसर्ग तसेच लोकांविषयी कुतूहल असणारे आणि या सर्वासाठी आपापला खर्च करण्यास तयार असणारे कोणीही यात सहभागी होऊ शकतात. सह्याद्री- दख्खनशी मॉन्सूनचा संवाद 'रंग मॉन्सून'चे मधून आपल्या समोर उलगडत राहीलच.

शनिवार, २३ जुलै, २०११

पुन्हा तारकांच्या विश्वात..



ओळखीच्या दगडी इमारतीच्या मधल्या चौकातून गोलाकार वळणे घेत जाणाऱ्या जीन्याची एक एक पायरी काठीने टेकत शेवटच्या मजल्यावर पोचायला बराच वेळ लागला. मुला- नातवंडांचा आधार घेत वयोवृद्ध आजी आजोबा अखेर शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या पांढऱ्या घुमटाखाली विसावले. दरवाजा बंद झाला, तसे घुमटाचे लालसर- निळ्या आकाशात रुपांतर झाले. कृत्रिम संधिप्रकाश अंधुक होत असतानाच आकाशात अस्पष्ट ठिपके चमकू लागले. संधिप्रकाश जाऊन पूर्ण काळोख पसरला.. तसे संपूर्ण आकाश तेजस्वी चांदण्यांनी व्यापले. मार्गदर्शकाचे बोल कानावर पडत होते.. सात ताऱ्यांचा तो सप्तर्षी.. चार ताऱ्यांच्यामध्ये तीन ताऱ्यांची रेषा.. ते मृग नक्षत्र.. तासाभरात नकळतपणे सर्वजण ५० वर्षांपूर्वीच्या दुनियेत फिरून आले.. ५० वर्षात किती बदल झाले.. पण आकाश तेच आणि ताऱ्यांचे तेजही तेच..उपस्थितांपैकी प्रत्येकजण पाणावलेल्या डोळ्यांमध्ये चांदण्यांनी भरलेले ते आकाश साठवून घेत होता.. आशिया खंडातील पहिल्या तारांगणाचा मान असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल- टिळक रोडच्या कुसुमबाई मोतीचंद तारांगणाचे आकाश २० वर्षांनी पुन्हा ताऱ्यांनी चमकले तेव्हा माजी विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
एकेकाळी पुण्यातील आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या या तारांगणाने सलग ३६ वर्षे देशभरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना तारकांच्या विश्वाची सफर घडवत वैज्ञानिक संस्कार केलेले. पुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा झगमगाट घेऊन आलेली देशभरातील इतर तारांगणे गर्दी खेचत असतानाच प्रोजेक्टरचा मुख्य दिवा बंद पडण्याचे निमित्त झाले आणि या तारांगणाचा लोखंडी दरवाजा १९९० मध्ये बंद झाला.. तो थेट २० वर्षांनीच उघडला. २००९ हे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष होते. त्या निमित्ताने हे ऐतिहासिक तारांगण पुन्हा सुरु व्हावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही सदस्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. देशभरतील तज्ञांना, खगोल अभ्यासकांना पाचारण करण्यात आले. मात्र तारांगणाच्या डोममध्ये प्रवेश करताच ६० वर्षे जुन्या प्रोजेक्टरची अवस्था पाहून सर्वांनीच 'अशक्य!. काहीही होऊ शकत नाही' असेच उत्तर दिले. नवी यंत्रणा बसवायचाही विचार झाला, तर कोटेशन्स होती ६० लाखांपासून ३ कोटींपर्यंत. मात्र काही झाले तरी पुण्यातले एकमेव तारांगण सुरु करायचेच असे ठरवलेल्या या सदस्यांना शेवटी पराग महाजनी हे खगोल अभ्यासक येऊन मिळाले आणि खरोखर अशक्याचे शक्य झाले.

असे झाले पुनरुज्जीवन 
महाजानींच्याच भाषेत सांगायचे झाले तर, आम्ही सर्वप्रथम डोममध्ये प्रवेश केला, तसा धुळीमुळे ठसका लागला. अनेक वर्षे बंद असल्यामुळे जळमटे आणि पालींचे साम्राज्य होते. सर्वप्रथम ते सर्व साफ करून घेतले. डोमच्या मधोमध एका लाकडी टेबलवर ६० वर्षे जुना स्पिट्झ लैबोरेटरीचा मोठा प्रोजेक्टर अक्षरशः पुराण वस्तूसारखा गंजलेल्या, मोडकळीस आलेल्या अवस्थेत आढळून आला. जवळ जाऊन एक एक भाग तपासायला सुरवात केली, तर गंजल्यामुळे सर्व भाग जाम झालेले. अथक प्रयत्नांनी सर्व भाग वेगळे केले. स्पिरीट आणि कापसाच्या साह्याने अनेक तास घासल्यावर प्रोजेक्टरचे खरे रूप दिसायला लागले. काही भाग जळालेले, काही गंजून बंद पडलेले, काही भाग असे होते, की त्यांचे नेमके काम काय हेच समजत होते. ६०- ७० वर्षांपूर्वी तयार झालेल्या या प्रोजेक्टरची आणि त्याच्या सुट्या भागांची निर्मिती बंद होऊनही चार दशके झाली असतील.
प्रोजेक्टर साफ केल्यावर सर्वप्रथम आम्ही त्याच्या वायरिंगची व्यवस्थित कागदावर आखणी करून घेतली, त्यावरून प्रत्येक भागाचे कार्य कसे चालते हे समजू लागले. दरम्यान, इंटरनेटद्वारे जगभरातील तारांगणतज्ञांशी संपर्क साधून त्यावेळच्या तारांगणान्ची माहितीपत्रके मागून घेतली. शक्य तेवढे वायरिंग बदलायचा प्रयत्न केला. पण जुन्या पद्धतीचे सोल्डरिंग काढायला थेट ईंडस्ट्रीयल गन आणावी लागली. काही सुटे भाग कोठेही मिळेनात तेव्हा त्याची डिझाइन्स तयार करून ते नव्याने करून घेतले. प्रोजेक्टरवरचे ताऱ्यांचे सर्व ठिपके बुजलेले होते. ते साफ करून घेतलेच, पण ताऱ्यांच्या रंगांनुसार आवश्यक त्या ठिपक्याला ठराविक रंगही दिले. त्यावेळच्या मोटर आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीची कोणी खात्री देईनात. पण अनेक दुकाने पालथी घातल्यावर काही जणांनी आमची अडचण समजून घेतली आणि कौशल्याने अनेक वर्षे बंद असणारे भाग सुरु करून दिले. या कामात मॉडर्न ऑप्टिक्सच्या गानू, अत्यंत क्लिष्ट मर्क्युरी स्वीचसाठी श्री करंदीकर, मोटरसाठी खोले, ट्रान्सफॉर्मरसाठी भोपटकर आदी पुणेकरांची मदत झाली. आणि पुण्याची शान असणारा हा प्रोजेक्टर खऱ्या अर्थाने पुणेकरांनीच सुरु केला. 

स्पिट्झ प्रोजेक्टरचा इतिहास 
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे रहणाऱ्या आर्मांड स्पिट्झ या पेपरविक्रेत्याला १९३६ च्यादरम्यान एके दिवशी त्याच्या मुलीने आकाशातील तार्यांविषयी काही प्रश्न विचारले. तिला उत्तरे देण्यासाठी आर्मांड याने पुठ्ठ्यापासून काही मॉडेल तयार केली. त्यातच सुधारणा करता करता त्याने गोलाचा उपयोग करून तारांगणाचा प्रोजेक्टर बनवला. मुलीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच, पण प्रोजेक्टरमुळे हा विषयही सोप्या पद्धतीने मुलांसमोर मांडता येऊ लागला. त्याचे कार्यक्रम गर्दी खेचू लागले. एकदा त्याचा शो बघण्यासाठी स्वतः अल्बर्ट आईंस्टाईन आले. त्यांनी त्या प्रोजेक्टरमधील भौमितिक त्रुटी दाखवून देतानाच त्या ऐवजी १२ पंचकोन वापरून डिझाईन सुधारण्याचा सल्ला दिला. त्यानुसार स्पिट्झ याने 'डोडेका हेड्रोन' प्रकारचा नवा प्रोजेक्टर विकसित केला. या प्रोजेक्टरला मोठे यश आले. त्यातून त्याने स्वतःची कंपनी सुरु करून सुमारे १५० 'डोडेका हेड्रोन' जगभरात विकले. त्यापैकी १९५४ मध्ये आशिया खंडात पाहिला प्रोजेक्टर पाठवला, तो पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. आईंस्टाईन यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला चालू स्थितीतील जगातला हा एकमेव प्रोजेक्टर आहे.
या प्रोजेक्टरमधून साध्या डोळ्यांना दिसणारे सर्व तारे, पाच ग्रह, आयनिकवृत्त, सूर्य- चंद्राची स्थिती, पृथ्वीचा नकाशा अशा सर्व गोष्टी ३० फुट व्यासाच्या डोमवर दाखवता येतात. इलेक्ट्रोनिक्स युगाच्यापूर्वी याची निर्मिती असल्यामुळे त्याची रचना पूर्णपणे मेकॅनिकॅल आणि इलेक्ट्रिकल आहे. हेच त्याचे वैशिष्ट्य असून, त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्यही आहे. दुरुस्त झालेल्या स्थितीतील हा प्रोजेक्टर पुढील किमान २० वर्षे तरी कोणत्याही मोठ्या बीघाडाशिवाय सुरु राहील असा दावा महाजनी करतात.

न्यू इंग्लिश स्कूलच्या तारांगणाचा इतिहास
राष्ट्रीय शिक्षणाची परंपरा असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. ऐतिहासिक नानावाड्यातून न्यू इंग्लिश स्कूलचे टिळक रस्त्यावरील नव्या इमारतीत स्थलांतराचे निश्चित झाले, त्याचवेळी ही इमारत वैशिष्ट्यपूर्ण असावी असा आग्रह प्राचार्य पु. ना. वीरकर यांनी धरला. त्यांच्याच पुढाकाराने शाळेची 'वाय' आकाराची इमारत आणि त्यावर मध्यभागी डोम अशी रचना करण्यात आली. ३० फुटी व्यासाच्या या डोममध्ये तारांगण सुरु करण्याचा ठराव डिईएसने पारित केला. त्यासाठी देशा- विदेशात प्रतिनिधी पाठवून प्रोजेक्टर्सची पाहणी करण्यात आली. मोतीचंद शाह यांनी दिलेल्या ५० हजार रुपयांच्या देणगीतून स्पिट्झ प्रोजेक्टर आणून १९५४ मध्ये हे तारांगण सुरु झाले. त्यावेळी आशिया खंडातील हे पहिलेच तारांगण होते.
नव्याने तारांगण सुरु करण्यात मोलाचा वाटा असणारे न्यू इंग्लिश स्कूलचे विज्ञान शिक्षक विनायक रामदासी यांच्या माहितीनुसार, १९५४ ते १९९० या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल तारांगणाचे शो गुरुवार, शुक्रवार आणि सुटीच्या दिवशी अखंड सुरु होते. फक्त पुण्यातूनच नाही, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली येत असत. प्रा. गिझरे, प्रा. पाठक, प्रा. विनायक जोशी आदी मंडळींनी तारांगणाद्वारे हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना आकाशदर्शन घडवले होते. 

पुन्हा तारकांच्या विश्वात
महाजनी आणि रामदासी यांच्याबरोबर तारांगण समितीचे सचिव दिलीप कोटीभास्कर, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रा. एस. जी. कुलकर्णी, तंत्रज्ञ हरीभाऊ पवार तसेच एकनाथ बुरसे, प्रल्हाद शिंदे आणि सु. भ. मुंडे या तीन मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांमुळेच तारांगणाला पुन्हा पूर्वीचे दिवस येऊ शकले. येत्या काळात तारांगणाला वातानुकुलीत करण्याबरोबर रेलिंगच्या नव्या खुर्च्या बसवण्याचा डिईएसचा विचार आहे. त्याचप्रमाणे खगोल शास्त्राच्या दालनाची निर्मिती, विद्यार्थी आणि हौशी नागरिकांसाठी अभ्यासक्रम, नियमित शोही नियोजनात आहेत.   
 मागीलवर्षी दसऱ्याचा मुहूर्त साधून सुरु झालेले हे ऐतिहासिक आणि पुण्यातील एकमेव तारांगण आता पुन्हा गर्दी खेचू लागले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी तारांगणाचे १२ शो झाले असून, चंद्रग्रहण आणि पिधनाच्यावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगा, त्यांचे ग्रह- ताऱ्यांचे आकर्षण, कुतूहलाने विचारलेले प्रश्न यामुळे तारांगणाला जिवंतपणा आला आहे. गेली दोन दशके फक्त इतिहास सांगणारा डोम पुन्हा विज्ञान शिकवू लागला आहे!

-----------------------------------------
तारांगणाच्या शोची नोंदणी  
तारांगणाचे शो सध्या फक्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असून, एका वेळी १०० विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश दिला जातो. ११ ते ६ या शाळेच्या वेळेच्या आधी आणि नंतर हे शो होतात. तारांगणाच्या शोसाठी नोंदणी करण्यासाठी शाळांनी २४३३६०२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
------------------------------------------
विद्यार्थीदशेत  डॉ. नारळीकरांचीही  भेट         
अनेक मान्यवर आपल्या विद्यार्थी दशेत न्यू इंग्लिश स्कूलच्या तारांगणाला भेट दिल्याचे आवर्जून सांगतात. त्यापैकी सर्वात महत्वाचे नाव म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ- डॉ. जयंत नारळीकर. बनारसमध्ये बीएस्सी केल्यावर सुट्टीसाठी पुण्यात आले असताना डॉ. नारळीकर यांनी १९५७ मध्ये तारांगणाला भेट दिली होती. प्रथमच अंधारात कृत्रिम तारे बघून त्यावेळी या विषयाबद्दल कुतूहल वाटल्याचे डॉ. नारळीकर सांगतात. 'हे तारांगण मला त्या आधी १० वर्षे म्हणजेच शालेय वयात पाहायला मिळाले असते, तर खगोलशास्त्राविषयी तेव्हाच जिज्ञासा निर्माण होऊन मी त्या दृष्टीने तयारी सुरु केली असती. पुढे आयुष्यात जगभरातील अनेक अत्याधुनिक तारांगणे पाहायला मिळाली. मात्र, न्यू इंग्लिश स्कूलचे तारांगण पाहताना मनात निर्माण झालेली उत्सुकता आणि कुतूहल काही औरच होते,' असे त्यांनी म. टा.शी बोलताना सांगितले.

- मयुरेश प्रभुणे 
रविवार महाराष्ट्र टाईम्स (२४ जुलै, २०११)